जन मेट्रो | साप्ताहिक विशेष लेख: अभिमान की आत्मपरीक्षण?

जैन धर्म, विकास आणि निसर्ग यांतील विसरलेली समतोलरेषा

कॉम्रेड. किशोर जैन

मी जैन आहे.
म्हणूनच आज मला केवळ इतरांना नाही, तर स्वतःलाही काही प्रश्न विचारावेसे वाटतात.

आज आपल्या समाजात अनेक जण गौतम अदानी यांचा अभिमानाने उल्लेख करतात. याचं मुख्य कारण असं दिलं जातं की ते जैन आहेत. “आपला माणूस मोठा झाला”, “देशासाठी मोठं काम करतोय” अशी विधानं आपण सहजपणे करतो. मात्र या अभिमानामागे आपण नेमकं काय पाहतो, याचा विचार फारसा केला जात नाही.

थोडा थांबून प्रश्न विचारायला हवा—आपण व्यक्तीच्या धर्मओळखीचा अभिमान बाळगतोय, की त्या व्यक्तीच्या कृतींचा?

‘गौतम’ हे नाव केवळ एक नाव नाही. गौतम स्वामी म्हणजे भगवान महावीरांचे पहिले शिष्य—त्याग, विवेक, अहिंसा आणि तर्कशुद्ध विचार यांचे प्रतीक. अशा नावामागे केवळ परंपरा नसते, तर एक मूल्यव्यवस्था असते. त्या नावासोबत समाज आणि निसर्गाप्रती जबाबदारीही जोडलेली असते.

आज मात्र आपण यशाकडे पाहतो, पण त्या यशासाठी कोणती किंमत मोजली जाते, याकडे दुर्लक्ष करतो. हीच खरी चिंतेची बाब आहे.

मोठे प्रकल्प उभे राहतात, उद्योग वाढतात आणि रोजगार निर्माण होतो—हे नाकारता येणार नाही. पण त्याच वेळी दुसरी बाजूही तितकीच खरी आहे. जंगलतोड होते, नद्या आटतात, आदिवासी लोक आपल्या जमिनीपासून दूर ढकलले जातात आणि निसर्गाचं संतुलन बिघडतं.

म्हणून हा प्रश्न एखाद्या व्यक्तीविरोधात नाही, तर अशा विकासाच्या संकल्पनेविरोधात आहे जिथे नफा केंद्रस्थानी असतो आणि माणूस व निसर्ग दुय्यम ठरतात.s

जैन धर्माकडे पाहिलं, तर तो केवळ आहार किंवा उपवासापुरता मर्यादित नाही. जैन धर्म हा एक जीवनदृष्टी आहे. त्याचं मूळ तत्त्व आहे—
“परस्परोग्रह जीवनाम्”, म्हणजे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत.

याचा अर्थ अगदी सोपा आहे. जंगल नष्ट झालं की पाणी आटतं. पाणी आटलं की शेती संकटात येते. शेती नष्ट झाली की माणूस उपाशी राहतो. आणि उपासमार वाढली की समाजात हिंसा वाढते. हे परस्परसंबंध जैन तत्त्वज्ञानाने हजारो वर्षांपूर्वीच स्पष्ट केले आहेत.

जैन धर्माचं आणखी एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे अनेकांतवाद. कोणतंही सत्य एकाच बाजूने पाहता येत नाही. प्रत्येक गोष्टीकडे अनेक दृष्टिकोनांतून पाहणं आवश्यक असतं.

मग विकासाबाबत फक्त “रोजगार मिळतो” एवढंच पाहणं पुरेसं आहे का? आदिवासी देशाचे नागरिक नाहीत का? जंगल देशाचा श्वास नाही का? निसर्गाशिवाय देशाचं अस्तित्व शक्य आहे का? असे प्रश्न विचारणं हे देशविरोधी नाही, तर जबाबदार नागरिकत्वाचं लक्षण आहे.

अहिंसा म्हणजे फक्त मांस न खाणं नाही. जर आपल्या मौनामुळे निसर्गाची हानी होत असेल, आपल्या समर्थनामुळे लोकांचं विस्थापन होत असेल, आणि आपल्या अभिमानामुळे अन्याय झाकला जात असेल, तर आपण अप्रत्यक्षपणे त्या हिंसेचे भागीदार बनतो.

जैन धर्म स्पष्ट सांगतो—हिंसा करणं पाप आहेच, पण हिंसेला समर्थन देणं किंवा तिच्याकडे डोळेझाक करणं हे त्याहून मोठं पाप आहे.

आज मला जैन असल्याचा अभिमान आहे, कारण हा धर्म करुणा, विवेक आणि आत्मपरीक्षण शिकवतो. मात्र धर्माचा वापर करून निसर्गहत्येला मूक संमती देणारी वृत्ती आपल्याला थांबवावी लागेल.

कारण जैन धर्म भांडवलशाहीच्या समर्थनासाठी नाही. तो श्रमण परंपरेतून आलेला आहे. तो निसर्गासाठी आहे, करुणेसाठी आहे आणि विवेकासाठी आहे.

खरा धर्म अभिमान दाखवण्यात नाही,
तर स्वतःला प्रश्न विचारण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.