जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्त
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाणी ऊकळुन गाळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन….!
दीपक गायकवाड – मोखाडा
मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे.त्यातच नळपाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेले जलशुद्धीकरण केंद्र प्रदीर्घ काळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.परिणामी नागरिकांना गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे.त्यामुळे खोडाळा वासीयांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने ध्वनिक्षेपकावरून दवंडी देऊन, नागरिकांनी पाणी ऊकळुन आणि गाळून पिण्याचे आवाहन केलेले आहे.त्यातच ऊन्हाची तिव्रता वाढु लागल्याने, पाण्याची पातळीही खालाऊ लागली आहे. मोखाड्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणी पुरवठा करणारा एकमेव पाणी साठवण तलावानेही तळ गाठला आहे. त्यातच जलशुद्धीकरण केंद्र ही बंद पडले आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी दुर्गंधीयुक्त व गाळ मिश्रित येत आहे. हे पाणी पिल्याने नागरिकांना पोटाचे – त्वचेचे विकार तसेच संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अन्य पर्याय नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरीकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने, गावात ध्वनिक्षेपकावरून दवंडी देत नळाद्वारे येणारे पाणी ऊकळुन आणि गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच तलावात जाणाऱ्या जनावरांच्या मालकांवर तसेच कपडे धुणाऱ्या नागरिकांवर कारवाई चा ईशारा देखील दिला आहे.
