नवी मुंबई, दि-५ आक्टोबर २०२५
मराठवाड्यात आणि राज्यामध्ये झालेला अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्याला सर्वोपरी मदत मिळण्या साठी राज्य सरकारने तिजोरी खुली करावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हाधिका-यांमार्फत हे निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड योनी पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,
मागील काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने व महाभयंकर पुरामुळे सर्व ग्रामीण भाग व शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे उध्वस्त झालेली आहेतच परंतु पुराच्या पाण्यामुळे शेत जमीन सुद्धा खरडून गेली आहे. जनावरे आणि गुरेढोरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. संसाराला लागणारे सर्व साहित्य आणि मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे या पुराच्या पाण्यात अतोनात नुकसान झाले आहे.. शेतकऱ्यांची जगण्याची उमेद कमजोर झाली आहे. त्यामुळे आत्महत्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशावेळी शेतकरी आणि पूरग्रस्तांना सहकार्य करणे, धीर देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करावे.
आमदार,खासदार,मंत्री,नोकरदार,व्यापारी,उद्योगपती,समाजातील श्रीमंत वर्ग,सर्व शैक्षणिक संस्था,सर्व हिंदी-मराठी व इतर चित्रपट श्रृष्टी,टिव्ही चॅनल्स आणि सर्व धार्मिक स्थळे या सर्वांनी जेवढी जास्त मदत करावी.
सरकारने त्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करून त्यांना या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी आपली तिजोरी खुली करावी.कोणतेही निकष न लावता व नियमांच्या चाकोरीत न अडकता जनतेला भरघोस मदत करावी. तसेच “शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी एक लाख रूपये व गुराढोरांच्या बाजार किंमती प्रमाणे मदत करत त्यांना धीर द्यावा”.
सरकारने बाकीच्या लोकप्रिय योजनांवर काही काळ अंकुश लावून सध्याची प्राथमिकता ही फक्त आणि फक्त अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करणे आहे हे लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे आणि संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची महाराष्ट्राची महान परंपरा कायम ठेवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्यातील सर्व पालकमंत्री, आमदार, खासदार यांनाही देण्यात आले आहेत .
