खोडाळ्यातील अशूध्द पाणी पेटणार…?
दीपक गायकवाड – मोखाडा
मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची आणि परिसरातील नागरिकांच्या नैमित्तिक गरजा भागवणारी दुय्यम बाजारपेठ आहे. स्थानिक रहिवासीं बरोबरच बाहेरून बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या खरेदीदारांसह विक्रेत्या फेरीवाल्यांचाही मोठ्या प्रमाणावर येथे राबता असतो. मात्र येथील अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे एकूणच जनजीवन अक्षरशः हैराण झालेले आहे. संपूर्ण तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.तथापी खोडाळा सारख्या मोठ्या लोकसंख्येला केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांची चालढकल,संबंधित ठेकेदार यांची ढोबळ उत्तरं आणि स्थानिक प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे जलजीवन योजनेचे पाणी पाईपातच अडकलेले आहे.त्यामूळे खोडाळा येथील अशुद्ध पाणी पेटण्याची दाट शक्यता वाढलेली आहे.
खोडाळा गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडलेले आहे.त्यातच तलावानेही तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांना गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. परिणामतः अशुद्ध पाण्यामुळे गावातील नागरिकांमधून पोटाच्या आणि त्वचेच्या तक्रारी वाढल्यामूळे एकूणच तक्रारींचा सुर अधिक तीव्रतेने प्रखर झालेला होता. वर्तमान पत्रांमधून ग्रामस्थांच्या तक्रारी थेट पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याबरहुकूम येत्या आठ दिवसांत येथील पाणीप्रश्न सोडवणार असल्याचे खात्रीलायक आश्वासन खासदारांना देत संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने वेळ मारून नेली होती. या घटनेनंतर तब्बल दोन आठवडे उलटून गेले तरी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या ढोबळ उत्तरांमूळे अजूनही शुध्द पाणी पुरवठ्याची सुतराम शक्यता दिसत नाही.त्यामूळे खोडाळ्यातील अशूध्द पाणी जोरदार पेट घेण्याची दाट शक्यता वाढलेली आहे.
♠️ ढोबळ उत्तरांची मालिका..♠️
♣️ याबाबत स़बंधित एजन्सी च्या महेंद्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना पाईप लाईन खोदाई करण्यासाठी जेसीबी मिळत नसल्याचे बालीश ऊत्तर महेंद्र यांनी दिले आहे.
तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता सुरेश पवार यांनी संबंधित एजन्सीची वाट दाखवत आपले हात सोडवून घेतले आहेत.
तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झालेले आणि जलजीवन मिशन योजनेच्या परिपुर्तीचा महत्वाचा दुवा असलेले नीरभवणे ( पुर्ण नाव माहीत नाही.) यांच्या कडे चौकशी केली असता, ४ इंच परिघाचे उच्च घनता पॉलीथिलीन पाईप ( High-Density Polyethylene pipe ) उपलब्ध नसल्याने काम खोळंबल्याचे परंतू सोमवारी दि. 20 एप्रिल रोजी काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरुन जनतेच्या हाल अपेष्टांची आणि त्यांना भोगाव्या लागत असलेल्या परिणामांचे गांभीर्य एकूणच व्यवस्थेला नसल्याचे उघडपणे प्रतीत होत आहे.
